तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर जिल्हा परिषद व पंचायत समिती गण हे दोन्ही सामान्य पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चाचपणीला वेग आला आहे. राजकीय चर्चांना आता चांगलाच ऊत आला असून काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, भाजप आणि अपक्ष अशा बहुरंगी लढतीचे चित्र निर्माण होत आहे.
अणदूर गण हा पारंपरिकरित्या काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. अपवाद वगळता या गणात काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात अदलाबदल दिसून येत आहे. त्यामुळे यंदा कोणाला उमेदवारी मिळते आणि कोण कोणाला साथ देतो, यावरच निवडणुकीचे संपूर्ण चित्र अवलंबून राहणार आहे.
गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव बाबुराव चव्हाण यांनी अणदूर जिल्हा परिषद गटातून आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. तर पंचायत समिती गटात माजी सरपंच धनराज मुळे यांच्या पत्नी मंगल मुळे यांनी विजयश्री मिळवली होती. आगामी निवडणुकीत मात्र नवे चेहरे आणि नवी राजकीय समीकरणे पाहावयास मिळू शकतात. उमेदवारीची माळ कोण गळ्यात घालतो यावर संपूर्ण निवडणुकीचा तोल अवलंबून आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
याशिवाय, या मतदारसंघात गेल्या काही वर्षांत तरुण मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तरुणांच्या मतदानाचा कल हाच उमेदवाराच्या विजय-पराजयाचा निर्णायक घटक ठरण्याची शक्यता आहे.
> एकूणच, अणदूर गणातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही यावेळी प्रतिष्ठेची ठरणार असून, कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Leave a reply













