कोपरगाव (प्रतिनिधी) : कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे एका पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. चासनळी येथील रहिवासी दिलीप मुजमुले हे चहाचा व्यवसाय करत होते, तर त्यांची पत्नी स्वाती मुजमुले अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. या दाम्पत्यामध्ये नेहमीच कौटुंबिक वाद होत असत आणि गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. दिलीप मुजमुले दारूच्या नशेत असल्यामुळे त्यांनी पत्नी स्वाती यांना मारहाण करून उशीने तोंड दाबून ठार मारले, आणि त्यानंतर पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी घराचा दरवाजा उघडला नसल्याने शेजाऱ्यांनी आवाज दिला, परंतु आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना शंका आली. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, दिलीप मुजमुले पंख्याला लटकलेल्या अवस्थेत, तर स्वाती मुजमुले जमिनीवर मृत पडलेल्या दिसल्या. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती आणि कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांना तपास करताना असे आढळून आले की, मृत दिलीप यांनी घरातील भिंतीवर खडूने शेजारील कुटुंबातील व्यक्तींची नावे लिहिली होती आणि ‘हे कुटुंब मला कायम त्रास देत आहे’ असा मजकूर लिहिला होता. या मजकुरामुळे पोलिसांनी शेजारील कुटुंबातील व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
पत्नीला चारित्र्याच्या संशयावरुन संपवलं, नंतर पतीने स्वत:चा जीव घेतला, शेवटच्याक्षणी घराच्या भिंतीवर लिहिली ‘त्या’ तिघांची नावं

0Share
Leave a reply












