राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडांबे खुर्द शिवारात उभारलेल्या जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरवरून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५० हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खडांबे खुर्द येथील गट क्रमांक ४२२ मध्ये जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर असून, २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजेपासून ते ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी टॉवर परिसरात प्रवेश केला. त्यांनी टॉवरसाठी वापरण्यात येणारे ‘सिल्वर’ रंगाचे प्रत्येकी ७५ ए.एच. क्षमतेचे ५ बॅटरी संच चोरून नेले. या बॅटऱ्यांची एकूण किंमत सुमारे ५०,००० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी कंपनीचे तंत्रज्ञ गणेश सोपान बानकर (वय ३४, रा. ब्राह्मणी, ता. राहुरी) यांनी १० एप्रिल रोजी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक कुदळे करत आहेत.
खडांबे खुर्द येथील जिओ टॉवरवरून ५० हजारांच्या बॅटऱ्या चोरीस ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

0Share
Leave a reply












