मानोरी (ता. राहुरी) / सोमनाथ वाघ : राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात मध्यरात्री बिबट्याच्या हल्ल्यात एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शेतकरी गौरव प्रकाश पवार यांच्या गोठ्यात मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गायीवर हल्ला चढवून ठार केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यावर त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाने सदरील घटनेचा पंचनामा करुन पीडित शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळून द्यावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मानोरीसह वळण, आरडगाव परिसरात बिबट्याचे वारंवार होणारे दर्शन आणि जनावरांवरचे वाढते हल्ले लक्षात घेता, नागरिकांनी वनविभागाकडे तात्काळ पिंजरे लावण्याची मागणी केली आहे. वनविभागाने वेळीच योग्य ती कारवाई न केल्यास गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
Leave a reply













