राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी तालुक्यातील सात्रळ गावात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. मुलाला फोनवरून शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पित्यासह त्याच्या मुलावर लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास सात्रळ येथील झेड.पी. कॉम्प्लेक्स परिसरात घडली. फिर्यादी सुनील आण्णासाहेब पंडित (वय ५४) यांचा मुलगा अक्षय याला आरोपींनी फोनवरून शिवीगाळ व दमदाटी केली होती. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी सुनील पंडित आरोपींकडे गेले असता, आरोपींनी त्यांना व त्यांच्या मुलाला पुन्हा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
वाद अधिक चिघळताच आरोपी क्र. २ याने सुनील पंडित व त्यांचा मुलगा अक्षय यांना लाकडी काठीने बेदम मारहाण केली. यावेळी आरोपींनी “तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी सुनील पंडित यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलिसांनी १) दादा शंकर वाघमारे, २) मयूर दादा वाघमारे आणि ३) दोन अनोळखी इसम (सर्व रा. सात्रळ) यांच्याविरुद्ध कलम ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १२९/२०२६ दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश आवारे हे करीत आहेत.
सात्रळमध्ये किरकोळ वादातून बाप–लेकास बेदम मारहाण ; चौघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0Share
Leave a reply












