तुळजापूर, दि. १८ (चंद्रकांत हगलगुंडे) : अतिवृष्टी आणि पुरामुळे डॅमेज झालेल्या सोयाबीनला हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी तुळजापूर तालुक्याचे युवा नेते तसेच महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे संचालक सुनील चव्हाण यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा हतबल झाला आहे. ढगफुटी सदृश पावसाने पिके पूर्णतः पाण्यात बुडाली असून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडून बेभावाने सोयाबीन खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांची निसर्गाबरोबरच व्यापाऱ्यांकडूनही लूट होत असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीस तातडीने परवानगी देण्याची मागणी केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शासनाने पुढाकार घेऊन नाफेडच्या खरेदी केंद्रांवर निश्चित दर ठरवून डॅमेज सोयाबीनची खरेदी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी तातडीने मंजूर झाल्यास हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळेल, असा विश्वास सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
Leave a reply













