प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील प्रवरा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय गोकुळ निकम (वय ४०, रा. बिलहटी, मु. पो. सात्रळ, ता. राहुरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळच्या सुमारास दत्तात्रय निकम हे सात्रळ येथील प्रवरा नदीपात्रात असताना अचानक पाय घसरून पाण्यात पडले. ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल, लोणी येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेबाबत लोणी पोलीस स्टेशनकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सतिष आवारे हे करत आहेत.
Leave a reply













