राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : घरासमोरून सांडपाणी काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना कोल्हार खुर्द (पाटीलवाडी) येथे घडली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी पती-पत्नीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी रिजवान रसुल सय्यद (वय २५, रा. पाटीलवाडी, कोल्हार खुर्द) हे कामावर गेलेले असताना, दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी आसमा सय्यद या घरासमोरून सांडपाणी काढत होत्या. याचा राग आल्याने शेजारी राहणाऱ्या आरोपी सोनाली प्रवीण बर्डे हिने आसमा सय्यद यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यानंतर फिर्यादी रिजवान सय्यद कामावरून घरी आल्यानंतर त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. तसेच, “आरडगाव येथून माणसे बोलावून तुमच्याकडे पाहून घेऊ” अशी धमकी आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी फिर्यादी रिजवान सय्यद यांच्या तक्रारीवरून आरोपी सोनाली प्रवीण बर्डे व प्रवीण पांडुरंग बर्डे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश आवारे हे करीत आहेत.
Leave a reply













