SR 24 NEWS

इतर

अणदूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – दीपक दादा आलूरे

Spread the love

तुळजापूर  प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठा, प्रतिष्ठेचा आणि अस्तित्वाची लढाई दर्शवणारा जिल्हा परिषद व पंचायत समिती गण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अणदूर गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून, येणाऱ्या काळात विविध समाजोपयोगी योजना खेचून आणून अणदूरचा कायापालट करू, अशी ठाम ग्वाही अणदूर गटाचे उमेदवार दीपक दादा आलूरे यांनी दिली.

गेल्या तीस वर्षांच्या राजकारण व समाजकारणातील प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले. मात्र प्रत्येक वेळी सकारात्मक भूमिका घेत सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाला चालना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, सोलापूरचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तसेच भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्यांमधून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आपण केले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

गेल्या दहा वर्षांत सत्तेत नसतानाही तुळजापूर तालुक्याचे विकासरत्न आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून, राणा दादांनी सत्तेचा विचार न करता परिसराच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. विकासकामांबाबत त्यांची भूमिका रोखठोक असून, राजकारणाला बगल देत कोट्यवधींचा निधी दिल्यामुळेच अणदूरचा कायापालट झाल्याचे आलूरे यांनी स्पष्ट केले.राष्ट्रीय महामार्गावरील बस स्थानक ते खंडोबा देवालय या मुख्य रस्त्याचे भव्य, दिव्य व सुशोभित लाईटसह झालेले काम गावाच्या वैभवात भर घालणारे ठरले आहे. हे काम जलदगतीने, पारदर्शक पद्धतीने आणि व्यापाऱ्यांचे नुकसान न होता पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत, यासह अनेक विकासकामे राणा दादांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

खंडोबा मंदिरासह विविध अपूर्ण विकासकामे प्रगतीपथावर असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकरी, मजूर, महिला बचत गट यांना सर्वतोपरी मदत करून अणदूरचे नाव लौकिकात वाढवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.देश, राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर आता महायुतीशिवाय पर्याय नसून, सर्वसामान्यांना न्याय देण्याचा आपला मानस आहे. यासाठी राणा दादा पाटील यांचे खंबीर नेतृत्व व पाठबळ लाभत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अणदूरच्या विकासासाठी राणा दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुनील मालक चव्हाण, साहेबराव घुगे, दीपक दादा घोडके, दयानंद मुडके, सिद्राम शेटे, बालाजी मोकाशे, डॉ. नागनाथ कुंभार, डॉ. विवेक बिराजदार, धनराज मुळे, अप्पू धामुरे, आप्पासाहेब शेटे, विशाल शेटे, मनोज मुळे, गुणवंत मुळे, विक्रांत दुधाळकर, प्रवीण घोडके, संगप्पा हगलगुंडे आदी सहकाऱ्यांना सोबत घेऊन विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेणार असल्याचे आलूरे यांनी सांगितले.

मतदारांनी भूलथापांना बळी न पडता शाश्वत विकासासाठी मतदानरूपी कर्ज देऊन विकासकामांची संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!