SR 24 NEWS

राजकीय

वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करा : खा. डॉ. अजित गोपछडे , संजय कौडगे यांची शिष्टमंडळासह पालकमंत्र्यांकडे मागणी

Spread the love

नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : महाराष्ट्रात वीरशैव लिंगायत समाजाची मोठ्या प्रमाणावर वस्ती असून या समाजाने महाराष्ट्राच्या सामाजिक , सांस्कृतिक ,आर्थिक , शैक्षणिक आणि धार्मिक प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे . त्यामुळे वीरशैव लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी राज्य शासनाने त्यांच्या विविध मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने आज पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे.

शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या हस्ते पालकमंत्र्यांना दिले आहे. यावेळी भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे , रामदास पाटील सुमठाणकर ,नागनाथ पाटील सावळीकर , डॉ. माधवराव पाटील उच्चेकर, खुशाल पाटील उमरदरीकर , डॉ.माधवराव कहाळेकर , बालाजी पांडागळे , किशोर स्वामी, बाबाराव भाले, यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे , जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, मा.आ.ओमप्रकाश पोकर्णा लक्ष्मणराव ठक्करवाड, राजेश कुंटूरकर, राजू एकलारे, सिद्राम पांडागळे ,गोविंद माकणे , रुपेश पाटील भोकसखेडकर आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री अतुल सावे हे आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने नांदेड येथे आले होते. त्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडल्यानंतर खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वात वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने पालकमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. यात वीरशैव लिंगायत समाजास OBC मधून सरसकट आरक्षण द्यावे. महात्मा बसवेश्वर अर्थिक विकास महामंडळाची स्वतंत्र रचना करणे आणि त्याचे सक्षमीकरण होणेसाठी 1000 कोटी रुपयांची तरतुद करणे. महाराष्ट्रातील शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या महानगरात वसतिगृह व अभ्यासिकांची उभारणी करणे. समाजाच्या उन्नतीसाठी सारथी, महाज्योती सारखी स्वतंत्र संस्था उभारणी करणे. समाजातील MPSC /UPSC करणाऱ्या विध्यार्थ्यांना आर्थिक साह्यता देणे.

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राची स्थापना करणे. मंगळवेढा येथे भव्य महात्मा बसवेश्वर स्मारकाची उभारणी करणे. अशा प्रमुख सात मागण्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मागण्या ठेवाव्यात. त्या मंजूर करून घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली . वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून घेण्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठपुरावा करू असा विश्वासही खा. डॉ. अजित गोपछडे यांनी यावेळी दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!