राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील खटकळी परिसरातील 30 वर्षीय तरुणाचा विजेच्या मुख्य तारेला स्पर्श होऊन विजेचा झटका बसल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. नारळाच्या झाडाच्या फांद्या तोडत असताना ही घटना घडली असून विद्युतरोधक साधने न देता हलगर्जीपणा करुन त्यास नारळाचे फांद्या तोडण्यास लावल्याने एका विरुद्ध गुन्हा राहुरी पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
देवळाली प्रवरा येथील खटकळी येथे रहिवासी असलेला मनोज दामोदर उमाप (वय 30) हा झाडे तोडण्याचे तसेच मोलमजुरीचे काम करत असत. शनिवार दि. 6 जुलै रोजी देवळाली प्रवरा येथील राजवाडा चौकात नारळाची फांदी तोडत असताना विजेच्या मुख्य प्रवाह असलेल्या तारेला मनोज याचा चुकून हात लागल्याने तीव्र शॉक बसून तो खाली पडला. त्यानंतर त्यास तातडीने रुग्णवाहिकेतून राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.तेथील वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मयत मनोज याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान मयत मनोज हा सुरेश पंडीत याच्याकडे नारळाचे फांदया तोडण्याच्या मजुरीच्या कामासाठी गेला असता नारळाचे झाडामधुन गेलेल्या वीजेच्या तारामध्ये विद्युत प्रवाह असतांना त्याकरिता कोणतीही विद्युतरोधक साधने न देता हलगर्जीपणा करुन त्यास फांदया तोडण्यास लावल्याने सदर तारांचा मनोज यास विजेचा धक्का बसुन मृत्युमुखी पडल्याची फिर्याद मयत मनोज याचा भाऊ सुनील दामू उमाप याने राहुरी पोलीसात दिली आहे. त्यानुसार सुरेश जयवंत पंडीत रा. देवळाली प्रवरा याच्याविरूद्ध राहुरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a reply













