अहिल्यानगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राहुरी-पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघात यंदा मोठ्या उत्साहात आणि आनंदात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समतेच्या महामानवाला अभिवादन करत भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी गावोगावी भेट देत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले तसेच त्यांच्या विचारांचा जागर करण्याचा उपक्रम राबवला.
जयंतीनिमित्त संपूर्ण मतदारसंघात उत्सवी वातावरण पाहायला मिळाले. विविध ठिकाणी प्रभातफेरी, अभिवादन कार्यक्रम, विचारमंच आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावागावातून नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करत होते. युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की, “न्याय, समता आणि बंधुत्व हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे केंद्रस्थान आहे. प्रत्येकाने हे विचार आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारले पाहिजेत. त्यांनी समाजाला स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखविला. त्यांच्या संविधानामुळे प्रत्येक व्यक्तीला समान हक्क मिळाले आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद प्राप्त झाली.
ते पुढे म्हणाले की, “आजच्या युवकांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श ठेवून आपले भविष्य घडवावे. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्यांच्या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो. समाजाच्या हितासाठी चांगले कार्य करत समृद्ध, सशक्त आणि न्याय्य समाज उभारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
दरम्यान, गेल्या ३५ वर्षांपूर्वी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी बुऱ्हानगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची सुरुवात केली होती. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याचा आणि परंपरेचा वारसा पुढे चालू ठेवत सामाजिक ऐक्य आणि विचारजागरणाचे काम सातत्याने सुरू असल्याचे कर्डिले यांनी नमूद केले.
या जयंतीनिमित्त राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये अक्षय कर्डिले यांनी प्रत्यक्ष भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. प्रत्येक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमांमधून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यावर विशेष भर देण्यात आला. न्याय, समता आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारित समाजरचना घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे जयंती उत्सव केवळ औपचारिक न राहता तो विचारजागृतीचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात ; अक्षय कर्डिले यांच्याकडून अभिवादन न्याय, समता, बंधुत्वाचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचा निर्धार – अक्षय कर्डिले

0Share
Leave a reply












