तिसगाव (प्रतिनिधी) : राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ मिरी, लोहसर व तिसगाव परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
एखाद्या लोकप्रिय नेत्याच्या दुर्दैवी निधनानंतर पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची जिल्ह्यात परंपरा असताना, यावेळी विरोधकांनी राजकारण करत निवडणूक लादली, ही दुर्दैवी बाब असल्याची टीका डॉ. विखे पाटील यांनी केली. “बारामतीला एक न्याय आणि राहुरीला दुसरा न्याय का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
बैठकीत बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, “जो पाणी देईल, त्यालाच निवडून द्या. वांबोरी चारीचे पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे.” जिरायत भागाला पाणी मिळवून देणे, विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
३९ गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वांबोरी पाणी योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले आणि आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातून या भागात पाणी पोहोचवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्व. कर्डिले साहेबांनी ३९ गावांमध्ये राबवलेली विकासकामे, लोकांशी ठेवलेला जिव्हाळा व प्रत्येकाच्या सुख-दुःखात दिलेला आधार याची आठवण करून देत, ही निवडणूक स्वतःची समजून कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन करण्यात आले. २३ तारखेला सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत होणाऱ्या मतदानात ९५ टक्क्यांहून अधिक मतदान घडवून आणण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
“माझं बूथ माझी जबाबदारी” या भावनेतून प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावात सक्रिय राहावे, असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून ही विकासाची गती कायम ठेवण्यासाठी अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या अनेक वर्षांत कर्डिले साहेबांनी 39 गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली असून प्रत्येकाच्या सुख-दुःखात त्यांनी कायम लोकसंपर्क ठेवला. वांबोरी पाणी योजनेचा पहिला व दुसरा टप्पा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सभामंडप उभारणी यांसारख्या अनेक विकासकामांतून या भागाला दिशा मिळाली आहे. ग्रामपंचायत स्तरापासून ते सहकार क्षेत्रातील विविध पदांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले. या सर्व कामांची जाणीव ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने काम करत अक्षय दादा कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
या बैठकीला आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजपा महायुतीचे पदाधिकारी, सरपंच, सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी जोरदार काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ डॉ.सुजय विखे पाटील व आ. मोनिका राजळे यांचा प्रचार झंझावात

0Share
Leave a reply












