नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेले अभूतपूर्व यश हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने व्यक्त केलेल्या विश्वासाचे तसेच विकासाच्या राजकारणाचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. हा विजय संपूर्ण पक्षाच्या सामूहिक नेतृत्वाचा आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांच्या बळावर जनतेने दिलेला आशिर्वादरूपी कौल असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केले.
या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, लोकप्रिय मंत्री व निवडणूक प्रभारी पंकजाताई मुंडे, विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे, महानगर अध्यक्ष अमरनाथ राजुरकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. प्रत्येक प्रभागात व प्रत्येक नगरात जाऊन केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासात्मक योजना, धोरणे व संकल्पना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आल्या.
‘विकसित भारत – विकसित महाराष्ट्र – विकसित नांदेड’ या दृष्टीकोनावर विश्वास ठेवत नांदेडच्या मतदारांनी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट कौल दिला आहे. नांदेड महानगरपालिकेत प्रथमच भाजपाला सत्तेची संधी दिल्याबद्दल शहरातील सर्व मतदारांचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी जाहीर आभार मानले.
तसेच पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यात नांदेडला ‘होली सिटी’ व ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने नेण्यासाठी तसेच सर्वांगीण विकास साधण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या सर्व विजयी उमेदवारांचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
Leave a reply













